एका ८० वर्षाच्या शेतकऱ्याने बच्चू कडू यांचा ताफा अडवून त्यांना थेट सवाल केला. तुम्ही गद्दारी का केली? धाराशिवमध्ये घडलेल्या या पॉलिटिकल ड्राम्याची चर्चा संपूर्ण राज्यभरात आहे. शेतकऱ्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. विशेषतः शिवसेनेकडून या व्हिडिओवर भाष्य केलं जातंय. आता जनताही तुम्हाला विचारतेय, असं संजय राऊत म्हणाले. बच्चू कडू यांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. होय आम्ही गद्दारी केली. नेत्याशी, पक्षाशी केली. मात्र जनतेसाठीच ही गद्दारी केली. असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलंय. तसेच आपण उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली? यावरूनही स्पष्टीकरण दिलंय.धाराशिवमध्ये प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला कुणीतरी पाठवून दिलं, असा संशय बच्चू कडू यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘ ते आमच्या वडिलांसारखे आहेत. मी त्यांच्यासोबत २-३ मिनिटं चर्चा केली. परंतु त्यांची मानसिकता चर्चा करायची नव्हती. त्या काकांची. ते कुणीतरी पाठवून दिलेल्यापैकी असावेत, असं चित्र होतं. पण एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही उद्धव शाहेबांना सोडून का गेले? असं ते म्हणत होते, यावरून बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं.बच्चू कडू म्हणाले, ‘ मी शिवसेनेत असताना आमच्यावर जेव्हा अन्याय झाला. त्यावेळी इथले पालकमंत्री भाजपाचे होते. आम्ही शिवसेनेचे होतो . आमच्यावर केसेस झाल्या. तेव्हा शिवसेनेकडून न्याय मिळाला नाही. शौचालय भ्रष्टाचार प्रकरण झालं. त्यात जेव्हा वरिष्ठांकडून न्याय भेटत नाही, हे पाहून आम्ही शिवसेना सोडली. प्रहार पक्ष स्थापन केला. २५ वर्षांपासून काम करतोय. आमचे स्वतःचे २ आमदार निवडून आले. हे शिवसेनेच्या ताकतीवर आले नाहीत. शिवसेनेच्या भरोशावर आणले नाहीत. शिवसेना सोडून एवढी वर्ष झाल्यानंतर स्वतःच्या मेहनतीवर, साडेतीनशे गुन्हे दाखल झाल्यानंतर १०० वेळा रक्तदान केलंय. कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून दोन आमदार निवडून आले आहेत.असं बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितलं.