ठाणे: ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी गोवंश तस्करांविरोधी कठोर कारवाई सुरु करत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची योजना आखली आहे. त्यानंतर पोलिसांनी शहापूर, कल्याण, मुरबाड, पडघा अशा विविध ठिकाणी धडक कारवाई करत गोवंश तस्करांना ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यानच टिटवाळा पोलिसांनी खडवली जवळ असलेल्या राये गावात गोवंश तस्करांविरोधात मोठी कारवाई करत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गाईंची गोवंश तस्करांच्या ताब्यातून सुटका केली आहे. गुप्त माहितीवरुन पोलिसांनी छापा हा टाकला आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर टिटवाळ्यात मोठ्या प्रमाणात गो तस्करांकडून गोवंशाची तस्करी सुरू असल्याची माहिती कितवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कितवा पोलिसांनी टिटवाळा परिसरातील राये गावातील निर्जन परिसरातील अनधिकृत आणि अर्धवट बांधलेल्या चाळींवर छापा टाकला. छापेमारीत खोल्यांमध्ये डांबून ठेवलेल्या ४६ गाई अढळल्या. सर्व गाईंची सुटका करण्यात अली आहे. तसेच संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. बकरी ईदच्या दरम्यान या सर्व गाईंची कत्तल करुन मोठ्या प्रमाणात याचं मांस महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी नेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ही कारवाई मुरबाड उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे, मुरबाड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, कुळगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोई, कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि टिटवाळा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बजरंग दलच्या मदतीने केली. याप्रकरणी पुढील तपास आता पोलीस करत आहेत.