१५ जुलै मुंबई वार्ता: शिवसेनेत केलेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे गटाकडून सरकारमधून बाहेर पडण्याबाबत अनेक कारणे देण्यात आली होती. यामध्ये एक कारण हे अजित पवार अर्थमंत्री असून ते शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. मात्र आता अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पुन्हा अजित पवारांकडेच अर्थ खातं देण्यात आले आहे. यावरून नेमकं काय घडलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यादरम्यान संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीनं त्यांना असा प्रस्ताव दिला की अजित पवारांना अर्थखातं द्यायचं नसेल, तर अर्थखातं तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे द्या. या प्रस्तावावर हे मागे आले ही माझी पक्की माहिती आहे. अर्थखात्याचा कौल अजित पवारांच्या बाजूनेच पडला आहे. असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे.
काल झालेले मंत्रिमंडळ खातेवाटप आणि मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यांच्या पार्श्वभूमिवर संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. पण त्यांचं काय करायचं आहे याचा निर्णय होत नसल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केलं.
दरम्यान आज नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. त्यासंबंधी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शासन आपल्या दारीं या उपक्रमात जनता त्यांच्या दारी जात नाही, त्यांना महत्व देत नाही. या कार्यक्रमात रेशन दुकानदारांना प्रत्येकी पन्नास माणसे आणायला सांगितली आहेत. जशी सभेसाठी माणसे आणली जातात तशीच जबरदस्तीने माणसे कार्यक्रमात आणली जातात असेही राऊत म्हणाले. जनता कोणाच्या दारात जाते हे लवकरच कळेल, असा दावा राऊतांनी केला आहे.