Home स्टोरी देव तेथेचि जाणावा!

देव तेथेचि जाणावा!

181

सिंधुदुर्ग प्रतिनिधी:

जे का रंजले गाजले, त्यांसी म्हणे जो आपुले!

तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा!’

सिंधुदुर्गातील लोकप्रिय स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या सेवानिवृत्तीवेळी या संतवाणीची आठवण झाली. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वारकरी सांप्रदायाने स्वत:चा वेगळा पंथ निर्माण केला नाही. हे वारकरी अन्य समाजापासून स्वतःला कधीही अलिप्त समजले नाहीत. हाताने काम-मुखाने नाम जपणाऱ्या अशा कुटुंबातील मुलांवर मुद्दामहून कोणतेही संस्कार कधीच करावे लागत नाहीत. या मुशीत घडणारी बालके मोठेपणी स्वत:बरोबर सहवासातील माणसांच्या आयुष्यातही आनंद पेरून जातात. हे अनेक थोर व्यक्तिमत्वांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे.

प्रत्येक जीवात परमात्म्यास पाहणाऱ्या अशाच एका वारकरी कुटुंबात डॉ. दुर्भाटकर यांचा जन्म झाला. विशुद्ध प्रेमळ भावनेने त्यांनी त्यांची सेवा बजावली. त्या सेवेने हजारो स्त्रियांच्या प्रसुती सहजसुलभ झाल्या. प्रसुतीचा निसर्गप्रदान आनंद गरजवंत, गोरगरीब स्त्रियांना कोणत्याही आर्थिक, मानसिक विवंचनेशिवाय मिळू शकला; कारण प्रसुतीसुद्धा आता गोरगरीबांच्या आवाक्यात राहिली नाही, हे धक्कादायक वास्तव आहे. स्त्रिया आणि नवजात अर्भकांसाठी देवदूत असणाऱ्या डॉ. दुर्भाटकर यांना सेवानिवृत्तीप्रीत्यर्थ शब्दसुमनांजलीद्वारे मानवंदना!

नवजात अर्भकांचे ‘ट्यॅहा-ट्यॅहा’, दिवस भरलेल्या गरोदर स्त्रियांच्या जीवांची तगमग, सुखरूप सुटका झालेल्या आईच्या चेहर्‍यावरचा निरागस आनंद, पै-पाहुण्यांची मोठी वर्दळ हे सारे दृश्य गेली काही वर्षे सावंतवाडीतील सरकारी उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीने पाहिले. स्त्री वर्गासाठी डॉक्टर खरोखरच देवदूत होते. त्यांच्या उपचारादरम्यान कधीच भेदभाव डोकावताना दिसला नाही. त्यांच्याशी बोलताना, त्यांना काही विचारताना मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्री प्रमाणेच गोरगरीब किंवा निरक्षर बाईच्याही मनात कधी भीती दिसली नाही. मुळात, डॉक्टरांचे बोलणे मोजकेच.! त्यांच्या शब्दांनी कुणाचे मन दुखावले नाही. रुग्णालयात जमलेल्या माणसांच्या गलक्यातून डॉक्टर कधी रुग्णालयात यायचे समजायचेच नाही. प्रथमच डॉक्टरना पाहणाऱ्या माणसांच्या चेहर्‍यावर आश्चर्य उमटायचे. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वात कमालीचा साधेपणा आहे. रुग्णांवर चिडताना ते कधी दिसले नाहीत. दिवसभरात मोठ्या संख्येतील प्रसुती, शस्त्रक्रिया, तपासण्या करूनही त्यांच्या चेहर्‍यावर प्रसन्नता दिसायची. हे शांत, निगर्वी व्यक्तिमत्व म्हणूनच सर्वांना जवळचे आणि हवेहवेसे वाटले. त्यांचे रुग्णालयातील येणे, त्यांचा रुग्णालयातील वावर आणि कामकाज आटोपून रुग्णालयातील जाणे हे सारे सहज असायचे. त्यात कधीच बडेजाव दिसला नाही. म्हणूनच, त्यांची भीती वाटली नाही. हे निष्काम कर्मयोगी सावंतवाडीला लाभले, यासारखे भाग्य नाही!

रुणालयातील प्रत्येक कोपरा बाळ-बाळंतिणींनी समृद्ध झालेला दिसायचा. एकदा डॉक्टरांच्या फेरीवेळी प्रसुती झालेल्या भगिनीने डॉक्टरांना काहीतरी माहिती विचारली. डॉक्टर हसले आणि म्हणाले, “याचे उत्तर माझ्यापेक्षा ही माऊली चांगले देईल.” आणि त्यांनी बाजूच्या बेडकडे उभ्या असणाऱ्या एका आजीला सांगितले, ” तू तिला चांगले सांगशील.”आजी आश्चर्याने डॉक्टरांकडे पाहत राहिली.डॉक्टर चालता चालता म्हणाले,” मुलं किती तुम्हाला?”आजी म्हणाल्या,” तीन मुलगे..” डॉक्टर म्हणाले, ” म्हणूनच याचे उत्तर तुम्ही देवू शकता. तीन मुलांना जन्म देऊन त्यांना मोठं केलंत तुम्ही..!” आणि डॉक्टर निघून गेले. असे अनेक किस्से असतील.

डॉक्टरांनी त्यांची सेवा इमानेइतबारे बजावली. सेवेशी प्रामाणिक, एकनिष्ठ राहिले. त्यांनी रुग्णांमध्ये देवत्व पाहिले. आजकाल दुर्मिळ होत चाललेली सेवा देऊनही ते म्हणतात, “मी कुठे काय केले? मला शासनाने पगार दिला.” यालाच सज्जनता म्हणतात, नाही का? केवळ कर्तव्यभावनेने त्यांनी दिलेली सेवा ही चिरकाल स्मरणीय झाली आहे.

डॉक्टरांना सेवाकाल वाढवून द्यावा, असे प्रत्येकालाच वाटते.. पण वर्तमानकाळात डॉक्टर सेवानिवृत्त झाले, हे वास्तव आहे. डॉक्टरांना सेवाकाल वाढवून मिळाल्यास आनंदच आहे. पण सेवानिवृत्ती म्हणजे शरीरास विश्रांती देण्याचा काळ असतो, याची जाणीवही आहे. डॉक्टरांच्या सुखी-समृद्ध भविष्यकालीन वाटचालीसाठी परमेश्वरचरणी प्रार्थना.! या अशा सामाजिक बांधिलकीचे भान आपल्या प्रत्येकात रुजावे, ही किमान अपेक्षा!

सौ. मंगल नाईक-जोशी, सावंतवाडी