सावंतवाडी: तळवडे ग्रामपंचायत मध्ये ७२ लाख ८१ हजार ७६ रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल जिल्हा परिषद कार्यालय कडून ११ मार्च ला प्राप्त झाला आहे. मात्र याबाबत अद्याप पर्यंत गटविकास अधिकारी सावंतवाडी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणी कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नारायण उर्फ बाळा जाधव यांनी दिला आहे.
तळवडे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी एकूण ११ जणांवर आरोप निश्चित केले असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. असे जिल्हा परिषदेने आपल्या अहवालात म्हटले आहे. तरी याबाबत अद्याप पर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे १ मे रोजी आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा तंटामुक्ती अध्यक्ष नारायण उर्फ बाळा जाधव, यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिला. या ग्रामपंचायत अपहार प्रकरणी आपण न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत सुशांत गावडे व शंकर सावंत उपस्थित होते. या अपहरण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता यांनी बिल रेकॉर्डिंग केले असून मोजमाप पुस्तकामध्ये खाडाखोड करण्यात आली असल्याचेही समजते. मात्र या अभियंत्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. ज्यांच्या सहीने ठेकेदाराला धनादेश देण्यात आले त्यांच्यावर आणि ठेकेदारालावर कोणती कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली नाही. यातील प्रत्येकावर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. नाहीतर याबाबत आपण न्यायालयात जाणार आहे असे नारायण जाधव यांनी सांगितले. तळवडे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी गटविकास अधिकारी संबंधितांना पाठीशी घालत आहेत त्याशिवाय वरिष्ठ अधिकारी देखील कारवाई टाळत असतील तर त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.