Home राजकारण उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा चाकरमान्यांचा निर्धार.

उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा चाकरमान्यांचा निर्धार.

130

मुंबई शिवसेना भवन येथे कुडाळ मालवण वासिय चाकरमान्यांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद.

 

 मुंबई: लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.शिवसेनेशी आणि उद्धवजी ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेल्यांना या निवडणुकीत गाडण्याची वेळ आली आहे. शिवसेनेमुळे मुंबईतील मराठी माणूस आणि कोकणी माणूस ताठ मानेने जगत आहे. गेली कित्येक वर्षे मराठी माणसाने शिवसेनेवरच विश्वास दाखविला असून यापुढेही शिवसेनेवर विश्वास दाखवावा. शिवसेनेतील गद्दारांमुळे उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली यावे लागले. मात्र येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण सर्वजण उद्धवजींच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना पुन्हा एकदा सन्मानाने मुख्यमंत्री करूया असे आवाहन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबईतील चाकरमानी मेळाव्यात केले. यावेळी उपस्थित चाकरमान्यांनी देखील उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार केला.

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांचा मेळावा बुधवारी सायंकाळी शिवसेना भवन दादर मुंबई येथे संपन्न झाला. या मेळाव्याला उपस्थित शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ विधानसभा संपर्क प्रमुख संग्राम प्रभूगावकर,महिला विधानसभा संपर्कप्रमुख अपूर्वा प्रभू, स्नेहल सावंत यांनी देखील मार्गदर्शन केले. याप्रसंगी कुडाळ मालवण मधील मुंबईस्थित चाकरमानी ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.