७ ऑगस्ट वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट या दिवशी ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ योजनेचे उद्घाटन केले. या योजनेच्या अंतर्गत देशभरातील १ सहस्र ३०९ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.या प्रसंगी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाल की, या योजनेचा लाभ देशातील सर्व राज्यांना होणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये अनुमाने ४ सहस्र ५०० कोटी रुपये खर्चून ५५ अमृत स्थानके विकसित केली जाणार आहेत. राजस्थानच्या ५५ रेल्वे स्थानकांचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे.
‘अमृत भारत स्थानक योजने’त महाराष्ट्रातील ४४ रेल्वेस्थानकांचा समावेश! देशातील रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबवण्यात येणार्या ‘अमृत भारत योजने’चा ६ ऑगस्ट या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.याविषयी मनोगत व्यक्त करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘देशातील ५०८ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ झाला आहे. देशातील रेल्वेस्थानकांच्या दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. या योजनेतून निर्माण होणार्या सुविधांमुळे रेल्वेस्थानकांमध्ये कायापालट होऊन प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. ‘अमृत भारत स्थानक’ योजनेमुळे रेल्वेस्थानकांचे पुनरुज्जीवन होईल. रेल्वेस्थानकातील प्रवेशाची ठिकाणे आणि स्थानक परिसराचा विकास, प्रतीक्षालये, स्वच्छतागृहे, ‘लिफ्ट’ (उद़्वाहक यंत्र), ‘एस्केलेटर’ (सरकता जिना), विनामूल्य ‘वायफाय’, स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र केंद्रे, प्रवाशांना माहिती देण्यासाठी उद़्घोषणा प्रणाली, दिव्यांगासाठी सुविधा आदी सुविधा टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत. या विविध पायाभूत सुविधांच्या नव्या अध्यायाची नोंद रेल्वेच्या इतिहासात होईल.’’
महाराष्ट्रातील पुढील रेल्वेस्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक’ योजनेत समावेश ! विभाग – अहिल्यानगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, लातूर, धाराशिव, पंढरपूर, सोलापूर.विभाग – आकुर्डी, कोल्हापूर, तळेगाव.विभाग – बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव, मनमाड, शेगाव.विभाग – वडसा, गोंदिया, चांदाफोर्ट, बल्लारशाह, चंद्रपूर, धामणगाव, गोधनी, हिंगणघाट, काटोल, सेवाग्राम, नरखेड, पुलगाव.विभाग – कांजूरमार्ग, परळ, विक्रोळी.विभाग – संभाजीनगर, गंगाखेड, हिंगोली डेकन, जालना, किनवट, मुदखेड, नगरसोल, परभणी, परतूर, पूर्णा, सेलू, वाशिम.विभाग – परळी वैजनाथ