परंतु लोकशाही दिन सुनावणीत अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसात जाण्याचा दिला सल्ला? _
कल्याण प्रतिनिधी (आनंद गायकवाड): – नागरीकांच्या तक्रारींचा झटपट निपटारा होण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या दालनात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते, सोमवारी पार पडलेल्या लोकशाही दिनात प्रभाग ४ जे अंतर्गत असलेल्या पूणे लिंक रोडच्या कडेला एका खाजगी जागेवर अतिक्रमण हटविण्याबाबतची तक्रार दाखल झाली होती, परंतु हे अतिक्रमण एकदा हटविण्यात आले होते ते परत झाले असल्याने त्या बाबतची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात देण्याचा अजब सल्ला लोकशाही दिनात तक्रारदाराला दिला असल्याचे समजते. या प्रकारातून लोकशाही दिनातही सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नसेल तर सामान्य जनतेने न्यायासाठी जायचे कुठे असा प्रश्न तक्रारदाराला पडला आहे .प्राप्त माहिती नुसार प्रभाग ४ जे मधील पूणे लिंक रोड वरील हॉटेल प्रसाद समोर असलेल्या वाहन तळासाठी आरक्षित असलेल्या आरक्षित भूखंडाच्या बाजुला असलेल्या खाजगी जागेवर एका भंगार विक्रेत्याने अतिक्रमण केल्याची तक्रार जागा मालकाने केली होती. या तक्रारीनुसार प्रभाग ४ जे च्या सहाय्यक आयुक्त सौ. सविता हिले यांनी सदर भंगार दुकानाची तोडफोड केलीही परंतु बांधकाम साहित्य जागेवरच ठेवले होते.
या कारवाई नंतर दुसऱ्याच दिवशी या भंगार विक्रेत्याने पून्हा आपला व्यवसाय जैसे थे करुन जागेवरील अतिक्रमण कायम ठेवले आहे. या बाबत तक्रारदाराने सहाय्यक आयुक्त सौ. सविता हिले यांचेशी वारंवार संपर्क साधून अतिक्रमण जैसे थे असल्याचे त्यांचे निर्दर्शनास आणून दिले होते, परंतु तक्रारदाराच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेल्याने अखेर तक्रारदाराने आपली तक्रार लोकशाही दिनासाठी मा. आयुक्तांच्या दालनात दाखल केली होती. या तक्रारीची सुनावणी सोमवारी पार पडलेल्या लोकशाही दिनात झाली. या सुनावणीत सदरचे अतिक्रमण एकदा काढून झाले होते ते पुन्हा झाले असल्यास त्याची तक्रार पोलिसात करण्याचा तक्रार दाराला सल्ला दिला असल्याचे समजते. एका बाजुने याच प्रभाग ४ जे मध्ये गेल्याच आठवड्यात कोळसेवाडीतील खाजगी जागेवरील तब्बल २२ अतिक्रमणे मुळ जागा मालकाच्या तक्रारीची दखल घेवून प्रचंड पोलिस बंदोबस्तात जमिनदोस्त करण्यात आली आहेत, तर आपल्या जागेवर पुन्हा झालेल्या अतिक्रमण हटविण्यासाठी आता पोलिसांकडे जाण्याचा महापालिका सल्ला देत आहे, याच न्यायाने कोळसेवाडीतीलही जी २२ अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आली आहेत ती अतिक्रमणे पून्हा उभी राहिली तर असाच सल्ला त्या जागामालकालाही देणार का? असा प्रश्न या तक्रारदारासह सर्वसामान्य जनतेतही निर्माण झाल्याशिवाय रहाणार नाही. या बाबतचा खुलासा जाणून घेण्यासाठी प्रभाग ४ जे च्या सहाय्यक आयुक्त सौ सविता हिले यांचेशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.