गडचिरोली: सिसिक्स्टीचे कमांडो पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये काल रविवारी रात्री साडेसात वाजता गडचिरोलीत झालेल्या चकमकीत एका दलम कमांडरसह तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. बिटलू मडावी असे या कमांडरचे नाव असून त्याच्यावर १२ लाख रुपयांचे बक्षीस होते. छत्तीसगडमधील दंतेवाड्यात दहशतवादी हल्ल्यात १० जवान हुतात्मा झाले होते. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांवरील ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या तीन नक्षलवाद्यांवर ३८ लाखांचे इनाम लावण्यात आले होते. गडचिरोलीतील मन्ने राजाराम उपपोलिस ठाणे हद्दीतील केडनर गावालगत ही चकमक उडाली. केडनार गावालगत नक्षलवाद्यांचा तळ असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने सी-६० कमांडो पथकाच्या दोन तुकड्या रवाना केल्या आणि शोधमोहीम राबवली.

जवानांचे पथक सायंकाळी साडेसातच्या सुमारास केडनार गावात पोहोचताच त्यांना सुमारे २५ नक्षलवादी दिसले. अहेरी आणि पेरमिली दलमच्या या नक्षलवाद्यांनी जवानांना पाहताच त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी पाऊस पडत असूनही अंधारात पथकाने कारवाई सुरूच ठेवली. अखेर शोधमोहिमेदरम्यान तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांना आढळले. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शस्त्रे आणि अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी, वासू आणि अहेरी दलमच्या श्रीकांतचा समावेश आहे. ९ मार्च रोजी साईनाथ नरोटे या सुशिक्षित तरुणाची हत्या झाली होती. त्या गुन्ह्यात बिटलू मडावी हा प्रमुख आरोपी आहे. त्याच्यावर जाळपोळीच्या दोन घटना, हत्या आणि इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत. ‘साईनाथ नरोटेसह अनेक सुशिक्षित निरपराधांची बिटलूने हत्या केली होती. त्याची दहशत संपवण्यासाठी जवानांचे प्रयत्न सुरू होते. त्यात अखेर रविवारी यश मिळाले,’ असे गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले आहे.