Home स्टोरी चेंबर ऑफ कॉमर्स ने परिणामकारता वाढवावी..! अमित शहा

चेंबर ऑफ कॉमर्स ने परिणामकारता वाढवावी..! अमित शहा

49

मसुरे प्रतिनिधी: जागतिकीकरणाच्या युगात देशातील सर्वच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजनी आपली परिणामकारकता वाढवली पाहिजे. महाराष्ट्र हा देशाच्या औद्योगिक प्रगतीचे नेहमीच प्रतीक राहिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी मुंबई येथे गुरुवारी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरच्या नव्या मुख्यालयाच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर अध्यक्ष ललित गांधी यांनी सर्वांचे स्वागत केले. श्री. शहा म्हणाले, ‘देशात उद्योग व्यवसाय आणि कृषी या क्षेत्रांत तसेच धोरण निर्मिती क्षेत्रातही अनेक संक्रमणे होत आहेत. तसेच आपली अर्थव्यवस्थाही संपूर्णपणे जागतिक होत आहे. अशा स्थितीत देशातील सर्व ‘चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर ‘नी आपल्या कामकाजाचे पुनरावलोकन केले पाहिजे. या बदलानुसार त्यांनीही कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे.”

आज भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. अशावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीदेखील सरकारची धोरणे,कायदा, पायाभूत सुविधा आणि विकास या क्षेत्राबद्दल बदल घडवून आणण्याबाबत सरकारकडे आग्रही आहे. तसेच उद्योग, व्यापार, कृषी या क्षेत्रांतील समस्याही सरकारकडे मांडत आहेत, अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्रा चेंबरची प्रशंसा केली. देशाच्या विकासात महाराष्ट्राने नेहमीच मोठा वाटा उचलला आहे.

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रातही मोठी क्षमता आहे. देशातील परकीय गुंतवणुकीच्या ३९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येते, सर्वांत जास्त परदेशी पर्यटकही येतात. देशातील स्टार्टअपपैकी सर्वात जास्त म्हणजे २५ टक्के स्टार्टअप महाराष्ट्रातच आहेत. देशातील सर्वात मोठे बंदर वाढवणदेखील महाराष्ट्रात उभारले जाणार आहे. अशावेळी मुंबई आणि परिसरातील पायाभूत सुविधांसाठी सात लाख कोटींचे प्रकल्प नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवले जात आहेत, असेही शहा यांनी स्पष्ट केले. या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,मंत्री मंगलप्रभात लोढा, नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर, चेंबर्स चे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर,चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, शंकर शिंदे, श्रीकृष्ण परब, रमाकांत मालू, मिलिंद गुप्ता, संजय सोनवणे, संगीता पाटील, प्रफुल्ल मालाणी उपस्थित होते.

 

 

फोटो …..

मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या मुख्यालयाचे उद्घाटन गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यक्ष ललित गांधी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर, श्रीकृष्ण परब, आशिष पेडणेकर आदी मान्यवर..