जालना: शेतात काम करत असताना वडिलांना विजेचा शॉक लागला व खाली पडले. त्यामुळे बाजूलाच खेळत असलेली १० वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांचा मुलगा वडिलांच्या अंगावर कोसळले. यात तिघांचाही विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनं वरुड नाव्हा गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील वरुड नाव्हा गावात ही दुर्दैवी घटना घडली. दुपारी चार वाजेच्या सुमारासह ही घटना घडली. विनोद म्हस्के ( वय ३२ ) असं मयत वडिलांचं नाव आहे. तर १० वर्षीय श्रद्धा आणि ७ वर्षीय समर्थ अशी मृत्युमुखी पडलेले मुलांची नावं आहे. विनोद म्हस्के हे त्यांच्या शेतात मल्चिंग पांगवत होते. यावेळी त्यांना उघड्या असलेल्या वायरमुळे शॉक लागला. यावेळी त्यांच्या बाजूला खेळत असलेले श्रद्धा आणि समर्थ हे दोघे चिमुरडे बाबांसाठी पिण्यासाठी पाणी घेऊन आले होते. वडिलांना विजेचा शॉक लागला याची या चिमुरड्यांना अजिबात कल्पना नव्हती. पुढे येताच त्यांनाही विजेचा शॉक लागला. विजेचा धक्का बसल्यामुळे श्रद्धा आणि समर्थ हे दोन्ही चिमुरडे वडिलांच्या अंगावर कोसळले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी या तिघांनाही जालन्यातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.