कुडाळ: नागपूर येथील दंगल मध्ये अचानक शेकडोंच्या संख्येने जमाव एकत्र येणे, हे दंगल पूर्वनियोजित असल्याचे सूचक आहे.दंगलीमध्ये हिंदू देवी देवतांची फोटो असलेली वाहने लक्ष करण्यात आली. दंगलीमध्ये पोलिसांवरतीही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. जनतेच्या रक्षणाचे दायित्व असलेल्या पोलिसांवरच धर्मांध जमावाने हल्ला केलेला आहे. हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट आहे.त्यामुळे नागपूर हिंसाचारातील धर्मांधआरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे कुडाळ येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने कुडाळ पोलीस स्टेशन येथे निवेदन देत केली आहे.
नागपूर येथील घटनेचे पडसाद कुडाळ मध्येही उमटले आहेत. या प्रकरणी कुडाळ मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. यावेळी संदर्भातील एक निवेदनही सादर केले आहे. या निवेदनामध्ये नागपूरच्या महाल परिसरात जोरदार दगडफेक आणि वाहन पेटवून देऊन दंगल घडवण्याचा प्रकार घडला. औरंगजेबाच्या कबर काढून टाकण्यासंदर्भात केलेल्या आंदोलनाचे कारण पुढे करत ही दंगल पेटविण्याची प्रकार घडला आहे. परंतु या दंगलीमध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचू शकणाऱ्या आहेत. या गोष्टींकडे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून आपले लक्ष केंद्रित करू इच्छितो. दंगलीमध्ये एकूण परिस्थिती पाहता अचानक शेकडोंच्या संख्येने जमाव एकत्र येणे, हे दंगल पूर्वनियोजित असल्याचे सूचक आहे. दंगलीमध्ये हिंदू देवी देवतांची छायाचित्र असलेली वाहने लक्ष करण्यात आली. दंगलीमध्ये पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.पोलीस उपायुक्तांवर कुर्हाडीचा घाव घालण्यात आला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत होते त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. दंगल नियंत्रण करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहे. पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत. जनतेच्या रक्षणाचे दायित्व असलेल्या पोलिसांवरच धर्मांध जमावाने हल्ला केलेला आहे. हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट आहे. यापूर्वीही आझाद मैदान या ठिकाणी अशाच प्रकारे धर्माधाने धुडगूस घातला होता. आता जर या धर्मांधांवर कारवाई केली नाही, तर त्यांचे मनोबल वाढेल. आणि हाच पॅटर्न ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवू शकतात. असे केल्यास महाराष्ट्रातील सामाजिक शांतता भंग होऊ शकते.त्यामुळे आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने ज्यांनी हा हिंसाचार केला त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच दंगल झाल्यानंतर काही राजकीय व सामाजिक नेते जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करून जनतेला दिशाभूल करीत आहेत. हे एकप्रकारे दंगलखोरांना पाठीशी घालण्या सारखे आहे. अशा लोकांची चौकशी करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रमाकांत नाईक, काशिनाथ निकम, चंद्रशेखर पाटील,सुविनय दामले,विवेक पंडित,महेश गंगावणे,संतोष परब,घनश्याम परब, सुशांत राऊळ,भिकाजी सडवेलकर, प्रख्यात काणेकर, सौरभ कुलकर्णी,कुणाल पांचाळ,धीरज पांचाळ आदी उपस्थित होते.