सावंतवाडी: आंबोली धबधबा व घाट परिसरात असलेल्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच बेधुंद पर्यटनावर चाप लावणे या उद्देशाने वन विभागाने आंबोली घाट व धबधबा परिसर या राखीव संवर्धन क्षेत्रात कचरा करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे आशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांना दंड करण्याचा पथदर्शी निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये कचरा करणे-१००० रु. दंड, वन्यप्राणी माकड यांना खाऊ घालणे/छेडछाड करणे-१००० रु. दंड, मद्यपान करणे/मद्य बाळगणे-१००० रु. दंड, धूम्रपान करणे-५०० रु दंड, दुसऱ्यावेळ वरील मनाई कृत्यांची आवृत्ती करणे-वनगुन्हा नोंदविणे अशा तरतुदी आहेत.
या अंतर्गत दिनांक-१६ व १७ जून या दोन दिवसात १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व ११,५०० चा दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. यामध्ये कचरा टाकनारे- २ व्यक्ती,धूम्रपान करणारे – 3 व्यक्ती, मद्यपान करणारे-२ व्यक्ती तर माकडांना खाऊ घालणारे- ६ व्यक्ती आशा प्रकारे मनाई कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी (IFS) यांचेकडून सर्व सुजाण नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी आपल्या आंबोली घाटातील निसर्ग व जैवविविधतेल टिकविण्यासाठी वरील प्रकारे मनाई करण्यात आलेले कृत्य कुणी करत असेल तर त्याला प्रतिबंधित करुन तिथे उपस्थित असलेल्या वन अधिकारी/कर्मचारी यांच्या निदर्शनास सदरची बाबा आणून द्यावी व कोकणाचे वैभव असलेल्या आपल्या आंबोली घाटाचे संवर्धन व संरक्षण करणे कमी आपले बहुमूल्य योगदान द्यावे.