Home स्टोरी आ. वैभव नाईक यांनी हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्गातील प्रशासकीय व्यवस्थेचा केला पोलखोल…!

आ. वैभव नाईक यांनी हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्गातील प्रशासकीय व्यवस्थेचा केला पोलखोल…!

236

आरोग्य, महसूल, वन विभागातील प्रश्नांबाबत विधानसभागृहात उठविला आवाज.

        

सिंधुदुर्ग: नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय शिक्षण विभाग व महसूल विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभाग, महसूल विभाग व वन विभागातील प्रश्नांबाबत विधानसभागृहात आवाज उठविला. यावेळी आ. वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गातील प्रशासकीय व्यवस्थेचा पोलखोल केला. लवकरात लवकर प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

 आ. वैभव नाईक म्हणाले, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून ते सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांचे आता तिसरे वर्ष सुरू आहे. परंतु मागील दोन अडीच वर्षात ओपीडी रुग्ण संख्या फार कमी झाली आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेले डीन व अकाउंट मॅनेजर नवले हे अत्यंत अनागोंदी कारभार करत आहेत.या महाविद्यालयात औषध खरेदीसाठी लेखाशीर्ष केलेला नाही.डीपीडीसी मधून औषध खरेदीसाठी त्यांना पैसे देण्यात आले. त्यामुळे याठिकाणी औषधांची देखील वानवा आहे. या महाविद्यालयात वर्षभरापूर्वी २५ डॉक्टर कंत्राटी पद्धतीवर काम करत होते. मात्र आता त्यातील केवळ तीन डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांचे पगार देखील तीन-तीन महिने दिले जात नाहीत. त्यामुळे आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांना गोवा येथे उपचारासाठी जावे लागते . रक्तपेढी विभाग बंद आहे. एक्स-रे मशीन, सिटीस्कॅन मशीन बंद असून शासकीय रुग्णालयामध्ये ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सिंधुदुर्गात दिल्या जात नाहीत. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी लवकरात लवकर यासंबधी बैठक घ्यावी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या तात्काळ सोडविण्यात याव्यात अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी केली.

 

   आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, राज्य सरकारने गेल्या वर्षी वाळू लिलावाचे धोरण जाहीर केले होते. परंतू सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वाळू लिलाव धोरणाची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. कालावल आणि वालावल या दोन खाडी आहेत त्या दोन्ही खाडीतील वाळूचे गेल्या वर्षी देखील लिलाव झाले नाहीत आणि यावर्षी देखील लिलावाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. हे वाळू लिलाव न झाल्याने अधिकाऱ्यांचा फायदा होत आहे. अधिकाऱ्यांना हप्ते गोळा करण्यासाठी संधी मिळत आहे. छोट्या छोट्या वाळू व्यवसायिकांच्या गाड्या पकडून अधिकाऱ्यांकडून त्यांना त्रास दिला जातो. त्यामुळे लवकरात लवकर वाळू धोरण निश्चित करावे अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी केली.

 

त्याचबरोबर अनेक नवीन तलाठी सझा स्थापन झाले आहेत. त्या ठिकाणी अद्यापही तलाठी पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे एका तलाठ्याकडे सात ते आठ गावांचा कार्यभार आहे. त्यामुळे तलाठी भरती प्रक्रिया देखील लवकरात लवकर पूर्ण केली पाहिजे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धुडगूस होत आहे. गवारेडे,रानडुक्कर,माकड हे शेतीचे मोठे नुकसान करत आहेत.एक वर्षांपूर्वी वन्य प्राण्यांवर उपाय योजनेसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. परंतु त्या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही, समितीची कार्यरेषा ठरलेली नाही त्याबाबतही लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी सभागृहात केली आहे.