सावंतवाडी: तालुक्यातील आंबोली येथील जमीन अतिक्रमण विषयी महसूल विभाग आणि वन विभागाकडून संयुक्त कारवाई करण्यात येईल. तसेच कबुलायतदार गावकर जमीनीचे वाटप भूमिपुत्रांना करण्यासाठी शासनाकडून आठ दिवसात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल. संबंधित अतिक्रमण धारकांचा खुलासा हा थातुरमातुर असून बेकायदेशीर नोटरी करून ती अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर कारवाई ही होणारच. असे आश्वासन प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दि. २१ फेब्रुवारी दिवशी आंबोली येथील उपोषणकर्त्यांना दिले.
आंबोली परिचे भाटले आणि रायाचे भाटले येथील अतिक्रमण हटवण्यासाठी सात दिवसापासून साखळी उपोषणाला ग्रामस्थ बसले होते . याठिकाणी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, मंडळ अधिकारी संजय यादव, तलाठी सुमित घाडीगावकर यांनी भेट दिली. ग्रामस्थांशी प्रांताधिकाऱ्यांनी चर्चा केली.
यावेळी प्रांताधिकारी म्हणाले, याप्रकरणी तहसीलदारांनी दिलेल्या खुलासामध्ये उलघडा होईल. सर्व्हे नंबर २३ आणि ७१ ची मोजणी होणार आहे. यावेळी ग्रामस्थांनी आणि महिलांनी येथील अतिक्रमण हटवल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे प्रांताधिकारी यांना सांगितले. मोठ्या प्रमाणात तिन्ही वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वन क्षेत्रपाल यांनी सदर मोजणी केल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सांगितले.