Home स्टोरी सावंतवाडी वन विभागाकडून आंबोली घाट व धबधबा परिसराची स्वच्छता..!

सावंतवाडी वन विभागाकडून आंबोली घाट व धबधबा परिसराची स्वच्छता..!

86

आजपासून अस्वच्छता केल्यास भरावे लागणार १००० चे उपद्रव शुल्क, कडक निर्बंध लागू-देधुंद पर्यटनावर अंकुश.

सावंतवाडी:  आज रोजी सावंतवाडी वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी मिळून सामूहिक स्वछता पार पाडली. या स्वछता मोहिमे अंतर्गत घाट सुरु होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे 10 किमी अंतराच्या रस्ता दुतर्फ परिसराची स्वच्छता करण्यात आली.

याचा सविस्तर वृत्तांत असा की, मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस नवकिशोर रेड्डी व सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांच्या संकल्पनेतून जैवविविधतेने नाटलेल्या, आपल्या कोकणाचे वैभव असलेल्या आंबोली घाट व धबधबा यांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने निसर्गावर घाला घालणाऱ्या अशा कचऱ्याचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आज सकाळ पासून ही मोहीम राबविण्यात आली होती. या अंतर्गत वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून धबधबा व घाट परिसरात पसरलेल्या कचऱ्याला वेचून एकत्र करण्यात आले. सर्व एकत्रित केलेला, अंदाजे 1 टन कचरा हा सावंतवाडी नगरपरिषदेच्या कचरा प्रक्रिया केंद्रात सुपूर्द करण्यात आला. या स्वछता मोहिमेचे वाटसरू तसेच आलेले पर्यटक यांनी कौतुक केले. सदरची स्वछता मोहीम ही सावंतवाडी वनक्षेत्रपाल-मदन क्षीरसागर, देवसू वनपाल-नागेश खोराटे, आंबोली वनपाल-नामदेव चौगुले यांचे नेतृत्वाखाली राबविण्यात आली. यामध्ये सावंतवाडी परीक्षेत्र व आंबोली परीक्षेत्र मधील सर्व अधिकारी- कर्मचारी सहभागी झालेले होते. यासोबतच धबधब्यावर स्टॉल लावणारे स्टॉलधारक, काही आंबोली ग्रामस्थ, संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोलीचे सर्व सदस्य यांनी या स्वच्छतेकामी महत्वाचा सहभाग नोंदविला.

सर्व पर्यटक तसेच स्थानिक ग्रामस्थ यांना सावंतवाडी वन विभागकडून आवाहन करण्यात येते की आंबोली घाट तसेच धबधबा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी असून त्याचे पर्यटकांनी व सुजाण नागरिकांनी नेहमीच जाण ठेवावी. उद्या दिनांक १५ जून २०२४ पासून आंबोली घाट तसेच धबधबा परिसरात अस्वच्छता करणे, माकड/वानर यांना खाऊ घालणे यासाठी १००० रु चे उपद्रव शुल्क आकारण्यात येणार आहे. राखीव संवर्धन क्षेत्र असलेल्या अशा आंबोली घाटातील जैवविविधता टिकवणे, अनिर्बंधीत पर्यटनावर चाप लावणे तसेच माकडांना खाऊ घालण्यामुळे त्यांच्या मानवावरील हल्ले व सवयी मध्ये होणारे बदल रोखणे यासाठी हे कडक निर्बंध वन विभागाने लागू केले असल्याचे जिल्ह्याचे वन विभाग प्रमुख, उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले आहे. तरी आंबोली घाटातील निसर्ग व जैविविधता टिकविण्यासाठी सर्व नागरिक व पर्यटक यांना वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.