सावंतवाडी: सावंतवाडी – टर्मिनसचा प्रश्न काही राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी १६ वर्षे तिष्ठत ठेवला, असा आरोप सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.
यासाठी २६ जानेवारीला टर्मिनससाठी होणाऱ्या आंदोलनाला येथील सर्वपक्षीय जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कै. जयानंद मठकर यांचे स्वप्न पूर्ण करावे, असे त्यांनी म्हटले आहे. याविषयी त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात असे नमूद केले आहे की, सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी २६ जानेवारीला आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात येथील सर्वपक्षीय जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. काही स्वार्थी लोकांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी या प्रश्नाकडे तब्बल १६ वर्षे दुर्लक्ष केले. त्यामुळे हा प्रश्न तसाच राहिला आहे. मात्र आता मठकर यांचे नातू मिहीर मठकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी टर्मिनस पुर्ण करण्यासाठी शिवधनुष्य उचलला आहे. त्यासाठी येथील जनतेने त्यांना सहकार्य करावे, असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.