सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी आगारातील बसेस विशेष करून सावंतवाडी कणकवली कुडाळ या स्थानकातील उरण येथे पाठवण्यात आल्याने गेले दोन दिवस स्थानिक ग्रामीण भागातील बस फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच कोल्हापूर, बेळगाव, पुणे या लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाले आहेत. एकीकडे सरकार एसटी बस सेवेमध्ये मोफत सेवा, महिलांना हाफ तिकीट अशा सुविधा देत असताना दुसरीकडे बस फेऱ्या आपल्या मेळाव्यांना वापरत आहेत. त्यामुळे प्रवाशांना ग्रामीण भागात ये जा करताना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. खरंतर या सरकारचं चाललंय तरी काय? यातून नेमकं साधायचं तरी काय? असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे एसटी विभागाचे जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत कासार यांनी व्यक्त केला आहे.
सावंतवाडी आगारातील १६ एसटी बसेस व अन्य आगारातील जवळपास ६० अशा जवळपास ७० ते ७५ एसटी बसेस गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागातील बस फेऱ्यांवर झाला आहे. हे असं योग्य नाही. असे श्री कासार म्हणाले.