Home स्टोरी वन विभागाकडून सावंतवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान……!

वन विभागाकडून सावंतवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान……!

206

सावंतवाडी: आजरोजी सावंतवाडी मधील जुना बाजारातील करोलवाडा येथे नाल्यामधील जाळीत अडकलेल्या अजगराची सुटका करून जीवदान दिले.

सावंतवाडी येथील करोलवाडा येथे राहणाऱ्या श्री. सलीम करोल यांना आज दुपारच्या दरम्यान त्यांच्या घराशेजारून वाहणाऱ्या नाल्यामध्ये एक अजगर जाळीत अडकला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब वनविभागाच्या कार्यालयात याबाबत कळविले. त्यानुसार सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनरक्षक रमेश पाटील व वन सहाय्यक बबन रेडकर यांची रेस्क्यू टीम तात्काळ जागेवर दाखल झाली. जागेवर पाहिले असता नाल्याच्या तोंडावर लावण्यात आलेल्या नायलॉन जाळीमध्ये अंदाजे ७ फूट लांबीचा अजगर अडकला असल्याचे दिसून आले.

 

 

अजगराने स्वतःभोवती नायलॉनची जाळी वेटोळे घालून घट्ट गुंडाळून घेतली होती. त्यामुळे ती जाळी आजगराला कचून जखम होण्याची शक्यता होती. शेवटी ती नायलॉन जाळी कटरच्या सहाय्याने कापून वनविभागाच्या रेस्क्यू टीमने आजगराची सुखरूप सुटका केली. सुटका केलेल्या अजगराला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वन विभागाच्या कार्यालयात वेळेवर याबाबत माहिती दिल्याबद्दल श्री.सलीम करोल यांचे वन विभागाकडून आभार मानण्यात आले.

रेस्क्यू ऑपरेशन करतांना वन विभागाचे पदाधिकारी आणि कर्मचारी

सदचे रेस्क्यू ऑपरेशन हे उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक श्री.सुनील लाड यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनरक्षक रमेश पाटील, वनसहाय्यक बबन रेडकर, रामदास जंगले, देवेंद्र सावंत यांनी पार पाडली.