सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राजस्थान सरकार आणि ‘जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणात नागौर जिल्ह्यातील डेगाना येथे लिथियम या धातूचे मोठे साठे सापडले आहेत. इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन, लॅपटॉप यांच्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीत लिथियम हा अत्यंत महत्त्वाचा धातू आहे. त्यामुळेच याला ‘पांढरे सोने’ असेही म्हटले जाते. ‘देशाच्या एकूण आवश्यकतेपैकी ८० टक्के आवश्यकता या साठ्यांमुळे पूर्ण होईल आणि चीनवरील भारताचे अवलंबित्व अल्प होईल’, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही मासांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ५९ लाख टन लिथियम असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र राजस्थानमध्ये सापडलेले साठे त्याहीपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
जगात सर्वाधिक लिथियम ऑस्ट्रेलियात!….लिथियम हा जगातील सर्वांत हलक्या वजनाचा धातू आहे. त्याच्या साहाय्याने रासायनिक उर्जेचे रूपांतर विजेमध्ये होते. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटर्यांमध्ये हा महत्त्वाचा घटक असतो. सध्या इलेक्ट्रॉनिक बॅटर्यांच्या वाढत्या वापरामुळे लिथियमचे साठे असणार्या देशांनाही महत्त्व प्राप्त आले आहे. जगातील सर्वाधिक ४७ टक्के लिथियम एकट्या ऑस्ट्रेलियात आहे. चिलीमध्ये ३० टक्के, तर चीनमध्ये १५ टक्के लिथियमचे साठे आहेत. लिथियमवरील प्रक्रियेपैकी ५८ टक्के प्रक्रिया चीनमध्ये होते, २९ टक्के चिलीमध्ये, तर १० टक्के प्रक्रिया अर्जेंटिनामध्ये होते.
इलेक्ट्रिक वाहनांना चालना!….भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. एका अंदाजानुसार वर्ष २०३० पर्यंत देशात १३ कोटींहून अधिक इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर असतील. या पार्श्वभूमीवर लिथियमच्या उत्पादनात भारत स्वयंपूर्ण झाला, तर बॅटर्यांच्या किमती आवाक्यात येतील आणि त्याचा लाभा इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला होऊ शकतो.