सावंतवाडी प्रतिनिधी: मुख्याध्यापिका वर्षा देसाई या शिस्त, समर्पण आणि सेवाभावाचा अनमोल ठेवा आहेत. उत्तम संघटन कौशल्य असल्यास शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे वर्षा देसाई यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांचे कार्य शैक्षणिक क्षेत्रासह शिक्षकांसाठी प्रोत्साहन व आदर्शवत आहे.असे प्रतिपादन अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष म. ल. देसाई यांनी केले.
चराठा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ वर्षा विजय देसाई यांच्या सेवानिवृत्ती व वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात म ल देसाई बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सौ वर्षा देसाई व त्यांचे पती विजय देसाई, दिर संतोष देसाई, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक गुरुदास कुबल, दिगंबर नाईक, माजगाव केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, लता कुसगावकर, माजी विस्तार अधिकारी लता कुसगावकर, चराठे सरपंच माजी रघुनाथ वाळके, चराठे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर नाईक, प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक सुभाष सावंत, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षकचे जिल्हा सरचिटणीस महेश पालव, निवृत विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर, अखिल संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय गावडे, सरचिटणीस रुपेश परब, महिला सेल अध्यक्ष तेजस्विता वेंगुर्लेकर, सचिव रोशनी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गुरुदास कुबल यांनी दोडामार्ग तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेचे बीज रुजविण्याचे कार्य वर्षा देसाई यांनी केल्याचे सांगितले. बाळू वाळके चराठे शाळा नं १ च्या सर्वांगीण विकासासाठी वर्षा देसाई यांनी पालक शिक्षक विद्यार्थी व समाज यांना संघटीत करून ही शाळा जिल्ह्यात आदर्शवत केल्याचे सांगितले. प्रमोद पावसकर यांनी विद्वत्ता पूर्ण, हुशार व्यक्तिमत्व आज शिक्षण क्षेत्रातून निवृत्त होत असल्याचे सांगितले. सतत मार्गदर्शन करणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षिका निवृत्त होत असताना मनाला खंत वाटत असल्याचे कवी विठ्ठल कदम यांनी सांगितले. यावेळी मुलगा अक्षय याने आपली आई माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले. सुन सौ ईशा देसाई यांनी सौ देसाई यांची शिस्त, समर्पण व धैर्य याचा सुंदर मिलाप असून त्यांची मेहनत् व समर्पण मनाला भावले असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी सौ वर्षा देसाई यांनी दोडामार्ग तालुक्यात पहिला शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडविल्याचा आपल्याला अभिमान असुन गुरुतुल्य व्यक्तिमत्व शिक्षक वामन देसाई हे आपल्याला पितासमान आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील विकासात्मक आव्हाने स्विकारल्यामुळेच चराठा शाळेचा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात नावलौकिक झाला याचे आपल्याला समाधान आहे. आपल्या सेवा काळातील प्रत्येक शाळेतील शैक्षणिक कार्यात सहकारी शिक्षक, पालक, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व पती विजय देसाई यांचे सहकार्य लाभले असून सेवानिवृत्त होत असताना आपण समाधानी असल्याचे सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सौ. देसाई यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध संस्था आणि व्यक्ती यांच्यावतीने सौ देसाई यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
या गौरव सोहळ्याला दोडामार्ग तालुकाध्यक्ष संतोष गवस, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष तेजस बांदिवडेकर, बालरोग तज्ञ डॉ दत्तात्रय सावंत, माजी केंद्रप्रमुख रावजी परब, ओटवणे शाळा माजी मुख्याध्यापक अरुण होडावडेकर, दिव्यांग संघटना अध्यक्ष साबाजी सावंत, ओटवणे हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, संजय परब, सेवानिवृत्त संघटना सचिव रामनाथ राऊळ, गुरुनाथ राऊळ, संजय शेडगे, अमोल पाटील, दत्ताराम सावंत, चराठा सरपंच प्रचिती कुबल, माजी सभापती गौरी पावसकर, दिगंबर पावसकर, लक्ष्मण उर्फ बाळू परब राघो परब, पुरुषोत्तम परब, राजन परब, हनुमंत मेस्त्री, सुयश्री वेजरे, शिक्षिका जयश्री पेडणेकर, धनश्री शिंदे, आदिती चव्हाण, अमिषा कुंभार, अंजली जोशी, अनघा निरवडेकर, श्रावणी सावंत, बापूशेठ कोरगावकर, अमोल कोळी आदी उपस्थित होते.
या गौरव सोहळ्याचे नियोजन वेदिका परिवार, वर्षा देसाई यांचे कुटुंब आणि सावंतवाडी अखिल भारतीय शिक्षक संघाने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृष्टी धुरी यांनी सुत्रसंचालन गणेश घाडी तर आभार अखिल भारतीय संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय गावडे यांनी मानले.