२१ जून वार्ता: ईडीने मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. करोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे जावळचे मित्र सुजीत पाटकर यांच्या मालमत्तेवरही छापा टाकण्यात आला आहे. एका सनदी अधिकाऱ्यांच्या ठिकाणावरही ईडीने छापा मारल्याचे समजते. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस?
नेमकी काय कारवाई सुरू आहे हे मला माहिती नाही. पण निश्चितपणे सांगतो की ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला, त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या होत्या. लोकांच्या जिवाशी अक्षरशः खेळण्यात आलं. पुण्यात तर एका पत्रकाराचाच मृत्यू झाला. त्यामुळे यासंदर्भातील चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, या छाप्यात काय मिळालं आहे हे ईडी सांगू शकेल. मला माहिती नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.