Home स्टोरी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे काम कौतुकास्पद…! अजय बिरवटकर

महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे काम कौतुकास्पद…! अजय बिरवटकर

77

सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे काम कौतुकास्पद आहे. जिल्हयातील गवळी समाजाने संघटीत राहून समाजाचा विकास साधावा. तसेच जिल्ह्यात गवळी समाज भवन उभारण्यासाठी सुरुवातीला जागा खरेदीसाठी स्वतः वैयक्तिक आर्थिक सहकार्यासह त्यानंतर ट्रस्टच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी दिली.

महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या १७ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त माडखोल येथील रुद्र सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गवळी समाजाच्या जिल्हा मेळाव्यात अजय बिरवटकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे उपाध्यक्ष युवराज गवळी, विश्वस्त विजय गवळी, शाहूवाडी कार्याध्यक्ष श्री. खेतल, रुद्र गवळी, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे, उपकार्याध्यक्ष बयाजी बुराण, सचिव नामदेव गो. गवळी, खजिनदार सिताराम केळुसकर, सहसचिव रामचंद्र भालेकर, सदस्य बाबुराव भालेकर, रामदास बुराण, विश्राम केळूसकर, कृष्णा पंदारे, प्रशांत हनपाडे, सुरेश वरेकर, प्रशांत बुराण, सिताराम गवळी, चंद्रसेन लाड, चंद्रकांत चिले, निकिता गवळी, अमिषा गवळी, सल्लागार शंकर काटाळे आदी उपस्थित होते.

यावेळी युवराज गवळी आणि विजय गवळी यांनी गवळी समाज मेळाव्यातील महिलांच्या उपस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व समाजबांधव आपल्या न्याय व हक्कासाठी संघटित होत असताना गवळी समाजाने आपली एकजूट दाखवून आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन केले. तसेच ट्रस्टचे कार्य विद्यार्थी प्रगतीसाठी केंद्रित असुन समाजातील जुन्या कालबाह्य आणि महिला बाबतच्या वेदनादायक रूढी परंपररांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

 

जिल्ह्याचा गवळीरत्न पुरस्कार रोहित वरेकर याला प्रदान.

     यावेळी कला कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसह संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात गवळी समाजाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सुप्रसिद्ध युवा आर्टीस्ट ओटवणे गावचा सुपुत्र रोहित सुरेश वरेकर याला ट्रस्टचा ‘गवळीरत्न’ हा मानाचा पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रोहित वरेकरच्या अल्पावधीतील कार्यकर्तुत्वामुळे गवळी समाजात नव्या पिढीसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून रोहित वरेकर यांची यशोगाथा हा समाजासाठी दीपस्तंभ ठरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

         यावेळी आपल्या देशाने हल्लीच ऑपरेशन सिंदूर मध्ये मिळवलेल्या यशाचे औचित्य साधुन गवळी समाजातील प्रवीण गवळी (माडखोल), संतोष गवळी (ओटवणे), निखिल केळुसकर (सोनुर्ली), संतोष वाजवे (वसोली कुडाळ) , सुरेश पंदारे (आंजिवडे कुडाळ) या आजी व माजी सैनिकांचा तसेच वैभववाडी कॉलेजच्या प्राचार्यपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल कारिवडेचे प्रा. नामदेव वि. गवळी, राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल आंबेगाव येथील प्रकाश शंभा केळुसकर, वयाच्या ६० व्या वर्षी कला स्नातक (राज्यशास्त्र) ही पदवी संपादन केल्याबद्दल शंकर गोविंद काटाळे, पोलिस पाटील पदावर नियुक्ती झाल्याबद्दल संदीप मोगम (सोनुर्ली), यशवंत दळवी (कुसुर), वैभव रमाकांत यादव (श्रावण), अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सौ. प्राजक्ता प्रवीण हनपाडे, वकील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या योगिता बुराण व निर्मला बुराण, सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा क्षेत्रातील प्रतिष्ठीत क्रीडादूत पुरस्कार प्राप्त बयाजी बुराण तसेच गुणवंत व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यानिमित्त खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा आणि लहान मुलांना संगीत खुर्ची या कार्यक्रमाला महिलांसह लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खेळ पैठणीचा मध्ये सौ. सुजाता संतोष काटाळे या विजेत्या ठरल्या तर द्वितीय क्रमांकाच्या सौ. रक्षा रमेश कोटकर आणि सौ. दिक्षा दशरथ शृंगारे या संयुक्तपणे विजेत्या ठरल्या. तसेच यावेळी रांगोळी व वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. या गवळी समाज मेळाव्याला सिंधुदूर्ग जिल्हयातील गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे सदस्य बाबुराव भालेकर यांनी, सुत्रसंचालन बयाजी बुराण, सत्कार व पारितोषिक वितरण सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे यांनी तर आभार सदस्य रामदास बुराण यांनी मानले.