१९ ऑगस्ट वार्ता: महाराष्ट्रातील सर्व कारागृहांची एकूण क्षमता २४ हजार कैद्यांची आहे. मात्र सध्या राज्यातील कारागृहात ४२ हजार कैदी शिक्षा भोगत आहेत. निर्धारित क्षमतेपेक्षा १८ हजार कैद्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळं सध्या कारागृह व्यवस्थेवर ताण येत असल्याची माहिती कारागृह प्रशासनाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. कैद्यांची संख्या वाढत असल्याने कारागृह प्रशासनावर आलेला ताण कमी करण्यासाठी ज्या जिल्ह्यात कारागृह नाहीत अशा ठिकाणी नवे कारागृह बांधण्याचे नियोजन करण्यात येत आल्याची माहिती देखील अमिताभ गुप्ता यांनी दिली. अमिताभ गुप्ता हे नागपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पालघर आणि अहमदनगर येथे नवीन कारागृह तयार केली जात आहेत. तर पुण्यातील येरवडामध्ये तीन हजार कैद्यांसाठी नवे कारागृह तयार केले जाणार असल्याचेही अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
राज्यातील कारागृहातील बंदिवानांसाठी सोयी सुविधांमध्ये वाढ करणार असल्याचेही गुप्ता म्हणाले. त्यासाठी कायद्यानुसार बंदीवानांचे जे हक्क आहे, ते त्यांना मिळवून देण्यास प्राधान्य दिले जाईल असे गुप्ता म्हणाले. कैद्यांची त्यांच्या नातेवाईकांसोबत होणाऱ्या भेटीची वेळ वाढवून देणं, फोन सुविधा देणं, कॅन्टीन सुविधेत सुधारणा करणं, गरम पाणी उपलब्ध करुन देणं अशा सोयी उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली.
कागागृहात असणाऱ्या कैद्यांचे नियमित समुपदेशन व्हावं याकरता अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये कैद्यांचे मन आध्यात्मकडे वळवण्याचे प्रयत्न देखील सुरु आहेत. त्याच अनुषंगाने पंढरपूर वारीच्या वेळी कैद्यांची भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याशिवाय त्यांचे मन आणि शरीर स्वस्थ राहावं यासाठी कैद्यांना नियमित योगा प्रशिक्षण देखील दिले जात असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.