Home स्टोरी परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सवामुळे अवघी कनकनगरी भक्तिमय. 

परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सवामुळे अवघी कनकनगरी भक्तिमय. 

161

कणकवली(वार्ताहर): योगीयांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराजांच्या ४६ व्या पुण्यतिथी महोत्सवास शुक्रवारपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या निमित्ताने प.पू. भालचंद्र महाराजांच्या भाविकांनी बाबांच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे दृश्य आज दुसऱ्या दिवशीही पहायला मिळाले. या उत्सवामुळे अवधी कनकनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. विविध धार्मिक कार्यक्रम संस्थानमध्ये साजरे होत आहेत.

महोत्सवाच्या दुसऱ्यादिवशी पहाटे भालचंद्र महाराजांच्या समाधीस्थळाचे विधिवत पुजन करण्यात आले. पुरोहितांच्या मंत्रोचारात सर्व भक्त कल्याणार्थ भालचंद्र महाराज महारूद्र महाभिषेक अनुष्ठान करण्यात आला. दुपारी महाआरती करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारच्या सत्रात भजनी कलाकारांनी भजने सादर करून भक्तिमय वातावरण केले. सायंकाळच्या सत्रात सांगली येथील ह.भ.प. संध्या फाटक पोतदार यांचे श्रीनाथ संप्रदाय गुरू-शिष्य याविषयावर किर्तन झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री दैनंदिन आरती झाली.

भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त बाबांच्या समाधीस्थळी नयनरम्य आरास करण्यात आली होती. त्यामुळे भालचंद्र महाराजांचे हे रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महोत्सवाच्या निमित्ताने संस्थान परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत.

रविवारी होणारे कार्यक्रम :

रविवारी पहाटे ५.३० वा. समाधीपुजन, काकड आरती, सकाळी ८ वा. सर्व भक्तिच्या कल्याणार्थ भालचंद्र महारूद्र महाभिषेक अनुष्ठान, दुपारी आरती, त्यानंतर महाप्रसाद, दुपारच्या सत्रात भजने, सायं. ४ वा. पुणे येथील ह.भ.प. उद्धव जावडेकर यांचे कान्होपात्रा या विषयावर किर्तन होईल. रात्रौ ८ वा. दैनंदिन आरती होईल.