Home स्टोरी देशातील समस्या सोडविण्यासाठी बहुजनांनी एकत्र यावे ! अॅड....

देशातील समस्या सोडविण्यासाठी बहुजनांनी एकत्र यावे ! अॅड. रोशन पाटील यांचे आवाहन 

139

कणकवलीत दर्पण प्रबोधिनीतर्फे व्याख्यानाचे आयोजन….!

 

मसुरे प्रतिनिधी:

 

देशात व समाजात अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी बहुजन समाजातील सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आपला देश संविधानावर चालतो. त्यामुळे प्रत्येकाला संविधानाबाबत ज्ञान असले पाहिजे. घरोघरी संविधानाचे पुस्तक ठेवावे. बहुजन समाजातील व्यक्तींनी आता शासक बनावे असे आवाहन शिवराज्य संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा व्याख्याते अँड रोशन पाटील यांनी कणकवली येथे केले.

 

भारतीय संविधान दिना निमित्त दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे येथील उत्कर्षा हॉल येथे भारतीय संविधानाचे महत्व व वर्तमान लोकशाहीची परिस्थिती’ या विषयावर व्याख्यान देताना श्री. पाटील बोलत होते. यावेळी दर्पण प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे व पदाधिकारी उपस्थित होते.

 

श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील दलित व दुर्लक्षित घटकांमधील मुला-मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक व्यवस्थेविरोधात लढा दिला. त्यामुळेच आता दलित व दुर्लक्षित घटकांमधील मुला-मुलींना शिक्षणाची कवाडे उघडी झाली आहेत. त्यामुळे या महापुरुषांचे योगदान तुम्ही-आम्ही विसरता कामा नये असे त्यांनी सांगितले.

उच्चवर्णीनी समाजात धर्म व जातीवर व्यवस्था निर्माण केली. त्यांचे परिणाम दलित व दुर्लक्षितांना भोगावे लागले. त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम महापुरुषांनी केले. बहुजनांना समाजाच्या प्रवाहात आणता यावे व आपला देश धर्म जातींच्या वर्चस्वखाली न चालता सामाजिक समानतेवर चालला पाहिजे. यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली. आपल्या देश विविधतेने नटलेला असून देशात विविध धर्माचे व जातीचे लोक एकोप्याने राहत आहेत. कारण आपला देश संविधानावर चालतो हे त्यांना चांगले ठावूक आहे, असे त्यांनी सांगितले.

संविधानामुळे देशात समानता नांदत असून समाजात परिवर्तन घडविण्यासाठी काम परिवर्तनवादी करीत आहेत. संविधानाचे महत्व अमूल्य असून ते प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आपला शत्रू दोन समाजात भांडणे लावून आपला स्वार्थ साधून घेत आहेत. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात कोणत्याही समाजात भांडणे लागून तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. महापुरुषांच्या इतिहासाबाबत आताच्या पिढीमध्ये प्रचंड प्रमाणात गैरसमज पसरवला जात असून हा गैरसमज रोखण्यासाठी परिवर्तनवाद्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आरंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यिक उत्तम पवार यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक प्रा. सिद्धार्थ तांबे यांनी केले. स्वागत आनंद तांबे व सुभाष कदम यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार नरेंद्र तांबे यांनी मानले. हे व्याख्यान ऐकण्यासाठी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेंद्र कदम, संदेश कदम, राहुल कदम, सुनील तांबे, सुरेश कदम, स्नेहल तांबे यांच्यासह दर्पण प्रबोधिनी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.