Home स्टोरी जालन्यामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली सर्वीस्तर माहिती!

जालन्यामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली सर्वीस्तर माहिती!

160

जालना: जालना जिल्ह्याच्या अंबडमधल्या सराटी अंतरवालीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याप्रकरणी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यानंतर आता पोलिसांनी लाठीचार्ज का केला? सराटी अंतरवली गावामध्ये नेमकं काय झालं? याचा घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे.काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?’जालन्यातली घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे.

 

उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्री बोलले होते, विविधप्रकारे आमचा त्यांच्याशी संवाद सुरू होता. त्यांनी उपोषण परत घ्यावं कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरतेनं काम करतंय, पण हा सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित विषय आहे, त्यामुळे हा एका दिवसात सुटणार आहे, पण हे सोडवण्याकरता वेगवेगळे प्रयत्न चालले आहेत आणि हे प्रयत्न गांभिर्याने चालले आहेत, हे आम्ही त्यांना सांगत होतो’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.’ते उपोषण सोडायला तयार नव्हते, त्यांची तब्येत खराब होत होती. अशाप्रकार उपोषण होत असेल आणि तब्येत खराब होत असेल तर त्यांना नेऊन ऍडमिट करण्याची जबाबदारी राज्याची आहे. कालही प्रयत्न केला पण त्यांनी उद्या या तेव्हा ऍडमिट करू असं सांगितलं.

यानंतर पुन्हा प्रशासन त्याठिकाणी गेलं आणि विनंती केली, पण आज पोलिसांना घेरून दगडफेक करण्यात आली. अधिकाऱ्यांसह 12 पोलीस यामध्ये जखमी झाले, त्यानंतर तिथे लाठीचार्ज करण्यात आला’, असं फडणवीसांनी सांगितलं.’लाठीचार्जमध्ये कोणीही गंभीर जखमी होऊ नये असे प्रयत्न करण्यात आले आहेत. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या, त्या जर नसत्या फोडल्या तर पोलिसांना वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं’, अशी भीतीही फडणवीसांनी व्यक्त केली.’मराठा समाजाशी आम्ही सातत्याने चर्चा केली आहे, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण का टिकलं नाही, मागच्या सरकारने काय केलं मी यावर बोलणार नाही.

आताही मुख्यमंत्र्यांनी स्वत: समिती तयार केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे, कुणीही कायदा हातात घेऊ नये’, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं.’उपोषणाला बसलेल्या व्यक्तीला घेरून बसायचं आणि त्याला मरण्यासाठी ठेवायचं, सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. सरकारला त्याला वाचवावं लागेल, सरकारला त्याला मरू देता येणार नाही.यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, कुणाची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सगळ्यांनी शांतता पाळावी. राजकीय नेत्यांना विनंती करतो बेहती गंगा में हात धोना बंद करा. हे योग्य नाही, राज्याच्या हिताचं नाही’, असं फडणवीस म्हणाले.

शांतता ठेवली पाहिजे. पवार साहेब मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांड झालं, गोवारी समाजाचे 113 लोक मृत्यूमुखी पडले. पवार साहेब पाहायलाही गेले नाहीत आणि त्यांनी राजीनामाही दिला नाही. जवळच्या लोकांनी आमच्यासोबत सरकार स्थापन केल्यामुळे पवार साहेब नाराज आहेत, चिडलेले आहेत, व्यथित आहेत, त्यामुळे ते आरोप करत आहेत. ते मोठे नेते आहेत, त्यामुळे मी त्यांना उत्तर देणार नाही’, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केला.