Home स्टोरी छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ आणि ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांविरोधात कठोर कायदे होण्यासाठी...

छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ आणि ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांविरोधात कठोर कायदे होण्यासाठी ६० सहस्रांहून अधिक हिंदूंच्या एकजुटीचा आविष्कार !

65

सिंधुदुर्ग :छत्रपती संभाजीनगर, २० मार्च (वार्ता.) – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात १९ मार्चला ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ काढण्यात आला. छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ, तसेच लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदे व्हावेत, या मागण्यांसाठी ६० सहस्रांहून अधिक हिंदूंनी या मोर्च्यात सहभागी होऊन हिंदु शक्तीचा आविष्कार दाखवला. क्रांती चौक येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास वंदन करून निघालेला मोर्चा सतीश मोटर्स – स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गे महात्मा फुले चौकात विसर्जित झाला. तेथे मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले.समारोपप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वंशज आणि भाजप आमदार श्री. शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री संदीपान भुमरे, भाग्यनगरचे हिंदुत्वनिष्ठ आमदार राजासिंह ठाकुर, ‘सुदर्शन न्यूज चॅनल’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, सहकारमंत्री श्री. अतुल सावे, मराठा क्रांती मोर्च्याचे श्री. विनोद पाटील, श्री. अभिजित देशमुख, श्री. राजेंद्र जंजाळ, राष्ट्रीय धर्माचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे, श्री. अप्पा बारगजे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, कु. प्रियांका लोणे आदी उपस्थित होते.

श्री. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्युज’

१) मोर्च्याच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगत आजच्या या मोर्चामुळे गुढीपाडवा साजरा केल्याचा आनंद झाला ! – श्री. शिवेंद्रराजे भोसले, आमदार, भाजपगेल्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आज शहराच्या नामांतराचा लढा यशस्वी झाला. प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम पाडल्याविषयी आणि नामांतराविषयी राज्यशासन अन् केंद्रशासन यांचे अभिनंदन ! मोर्च्यानिमित्त असलेले भगवे ध्वज पाहून जणूकाही आजच गुढीपाडवा आपण साजरा करत आहोत, असे वाटले.

२. औरंगाबादचे नाव पालटले, आता चरित्रही पालटणार ! – श्री. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्युज’ औरंगजेबाचे नाव शहराला का हवे ? औरंगजेब हा क्रूर बादशाह होता. त्याने बादशाह बनण्यासाठी स्वतःच्या भावाचा वध केला. मुलाला कारागृहात डांबले. बादशाह होण्याचे स्वप्न त्याला २७ वर्षे पूर्ण करता आले नाही. मराठ्यांनी त्याला पळताभुई थोडी केली. दुसरीकडे धर्मरक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना करताच येऊ शकत नाही. औरंगाबादचे नाव पालटले, आता चरित्रही पालटणार. नुकतीच ‘जी २०’ देशांची बैठक संभाजीनगर येथे झाली. त्यातील पाहुण्यांना ‘बिबी का मकबरा’ दाखवण्यात आला. त्याखालीसुद्धा एक हिंदु मंदिर आहे, तेसुद्धा आपल्याला मुक्त करावे लागेल. शहरात टिपू सुलतान आणि औरंगजेब यांची जयंती साजरी केली जाते, हे यापुढे होता कामा नये.

३) नामांतरणास धर्मांधांचा विरोध का ? – श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, भाग्यनगर धर्मांधांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रीमंडळात मुसलमान होते, असा प्रचार केला जातो. असे असतांना शहराच्या नामांतरणास मुसलमानांकडून विरोध का ? आज मी येणार म्हणून मलाही संभाजीनगरमध्ये येण्यास विरोध होत आहे. मी शहरात दंगे घडवण्यासाठी नाही, तर हिंदूंच्या संघटनासाठी आलो आहे. आज गड-दुर्गांवर हिरवे अतिक्रमण होत आहे. प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावे. पुरातत्व विभागाने गड-दुर्गांवर भगवा ध्वज घेऊन जाणार्‍यांचा सन्मान ठेवायला हवा.