कुडाळ प्रतिनिधी: गेले दोन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील चेंदवन गावात वेलवाडी, निरुखेवाडी परिसरात भूस्खलन सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यातच सततच्या पावसामुळे पुराचाही धोका उद्भवला आहे, अश्या परिस्थितीत भाजपा नेते निलेश राणे यांनी आज चेंदवन गावाची पहाणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी वेलवाडी येथे भेट देत निलेश राणे यांनी खचलेल्या भागाची पहाणी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, खचलेला डोंगर हा अतिषय धोकादायक असून धोका पत्करून धोकादायक घरात न राहता सुरक्षित जागी स्थलांतरित होण्याची विनंती करत यांच्या पुढील व्यवस्थेसाठी वेलवाडी ग्रामस्थांना निलेश राणे यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी येत्या काळात कायमस्वरूपी उपाययोजना योजनांसाठी प्रयत्न करू मात्र सद्यस्थितीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी स्थलांतर आवश्यक आहे त्यासाठी प्रशासनासोबत स्थानिक लोकप्रतिनिधींना सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करत चेंदवन तलाठी व मंडल अधिकारी यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.
