Home स्टोरी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींकडे विश्वकल्याणाची प्रार्थना करा! गुरुमाऊलीगुरुपूजन व दर्शनासाठी हजारो सेवेकर्‍यांची गर्दी….

गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींकडे विश्वकल्याणाची प्रार्थना करा! गुरुमाऊलीगुरुपूजन व दर्शनासाठी हजारो सेवेकर्‍यांची गर्दी….

153

नाशिक (प्रतिनिधी):– गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतांना सेवेकर्‍यांनी वैयक्तिक काही न मागता राष्ट्रहित आणि विश्वकल्याणासाठी प्रार्थना करावी असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले. सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रारंभ झाला असून शुक्रवार दि. ३० जून रोजी त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात हजारो सेवेकर्‍यांनी परमपूज्य गुरुमाऊलींचे दर्शन, आशीर्वाद घेतले आणि श्री स्वामींच्या मूर्तीचे पूजन करून गुरुपद स्वीकारण्याची प्रार्थना केली.

त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात उवस्थित सेवेकरि

यावेळी गुरुमाऊलींनी सेवेकर्‍यांना संबोधित केले. गुरुमाऊली म्हणाले की, कलियुगाचे चालक, मालक व पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तेच गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु आणि गुरुतत्त्वही तेच आहेत. गुरुतत्त्व संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून दशांगुले उरले आहे. त्यामुळे अंतर्यामी असलेल्या महाराजांना तुमच्या समस्या, प्रश्न सांगण्याची आवश्यकता नाही. दररोज ११ माळा श्री स्वामी समर्थ जप, श्री स्वामी चरित्राचे क्रमश: ३ अध्याय आणि पंचमहायज्ञ ही अल्पशी सेवा नियमितपणे केल्याने महाराज कोणतेही प्रश्न शिल्लक ठेवत नाहीत. त्यामुळे महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना सर्वांचे भले व्हावे, राष्ट्रहित आणि विश्वकल्याण व्हावे अशी प्रार्थना करा, दुसर्‍यांचे चांगले चिंतले तर आपलेही चांगले होते हा कानमंत्र गुरुमाऊलींनी सेवेकर्‍यांना दिला.

दर्शनासाठी हजारो सेवेकर्‍यांची गर्दी.

आईवडील हे प्रथम गुरु, प्राथमिक शिक्षण देणारे द्वितीय, माध्यमिक शिक्षण देणारे तृतीय, रोजगार देणारे चतुर्थ आणि हरवलेली मन:शांती मिळवून देणारे आध्यात्मिक पाचवे गुरु ज्याला लाभले त्याचे जीवन सुखमय झाले. जीवनात गुरु अनेक मिळतील मात्र सत्शिष्य होण्याची पात्रता आपल्यामध्ये आहे का? याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. वीर बजरंगबली आणि धनुर्धारी अर्जुन यांच्या तोडीचे शिष्य आजपर्यंत झालेले नाहीत असे विचार त्यांनी मांडले. यंदाच्या गुरुपौर्णिमेपासून पुढील वर्षीच्या गुरुपौर्णिमेपर्यंत सेवेकर्‍यांनी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय सेवा म्हणून अब्जचंडीची सेवा पूर्ण करावी. त्यातून सेवेकर्‍यांनाही फलश्रुती मिळेल. हे महाराजांचे कार्य आहे. ते जनतेपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. अवघे विश्व स्वामीमय झाले तर कोणत्याच समस्या शिल्लक राहणार नाहीत. त्याकरिता सेवेकर्‍यांनी दररोज किमान १ तास स्वामी सेवेसाठी द्यावा तसेच एक नवा सेवेकरी घडवावा. उद्या महाराज आपल्याला विचारतील की, तुम्ही किती नवीन सेवेकरी घडविले तेव्हा आपली पाटी कोरी असता कामा नये असे सांगून गुरुमाऊलींनी सामुदायिक ऐक्य, सामुदायिक सहजीवन आणि सामुदायिक बांधिलकी जपली जावी असे स्पष्ट केले.

यावेळी गुरुपुत्र श्री.चंद्रकांतदादा मोरे, श्री. नितीनभाऊ मोरे हेही उपस्थित होते.गुरुपूजन दर्शन सोहळागुरुपूजन दर्शन सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने सेवेकरी दाखल होत असून शनिवार दि. १ जुलै रोजी गुरुपीठात परमपूज्य गुरुमाऊली श्री.आण्णासाहेब मोरे यांच्या पावन उपस्थितीत गुरुपूजन-दर्शन सोहळा होणार आहे. शुक्रवार दि. 30 जून रोजी गुरुदर्शनासाठी सेवेकर्‍यांची गुरुपीठामध्ये प्रचंड गर्दी उसळली होती.