गोवा प्रतिनिधी: (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – एकीकडे बहुसंख्य हिंदूंना धर्माच्या आधारावर कोणत्याच सुविधा मिळत नाही; याउलट अल्पसंख्यांक म्हणून अन्य धर्मियांना मात्र ‘अल्पसंख्यांक आयोगा’कडून ३ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या सुविधा मिळतात. उत्तर प्रदेश येथील अल्पसंख्याकांच्या एक वैद्यकीय शिक्षण संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी हिंदू धर्मांतर करून प्रवेश घेत आहेत, इतकी गंभीर स्थिती आहे. ‘वक्फ बोर्डा’त केवळ २ अहिंदू सदस्य घेतले, तर लगेच ‘सरकार असे करू शकत नाही’, असा न्यायालय निर्णय देते. अहिंदूंचे एकही प्रार्थस्थळ, श्रद्धास्थान सरकारच्या नियंत्रणात नाही, तर प्रत्येक राज्यातील विविध कायद्यांद्वारे हिंदूंची मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. काशी-मुथरा येथील मंदिरांच्या मुक्तीचा कायदेशीर लढा आम्ही देत आहोत. केवळ हे पुरेसे नसून देशातील प्रत्येक मंदिर मुक्त करण्याच्या लढ्यात हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक आहे, असे आवाहन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले.

सनातन संस्थेने आयोजित केलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ते बोलत होते. या प्रसंगी ‘सेव कल्चर सेव भारत फाऊंडेशन’चे श्री. उदय माहुरकर, चंडीगढ येथील लेखक आणि विचारवंत श्री. नीरज अत्री, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या ‘ई’ बुकचे प्रकाशन करण्यात आले.
माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर म्हणाले की, सध्या सोशल मीडिया, ‘ओटीटी’, चित्रपट यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आक्रमण होत आहे. पॉर्नोग्राफीमुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. हा राक्षस मोबाईलच्या माध्यमातून आता घराघरांत पोहोचला आहे. सनातन संस्कृती, पुढील पिढी वाचण्यासाठी हे सांस्कृतिक आक्रमण रोखणे आवश्यक आहे. तर चंडीगढ येथील लेखक आणि विचारवंत श्री. नीरज अत्री म्हणाले की, सध्या समाजात पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात अनेक जण धन्यता मानत आहेत. सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदूंच्या डोक्यावर बसलेले पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणाचे भूत उतरवणे आवश्यक आहे.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे म्हणाले की, बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनात हिंदूंनाच मारण्यात आले. काश्मीर, केरळ आणि बंगाल येथून हिंदूच संपत चालले आहेत. नुकत्याच पहलगाम येथेही धर्म विचारून हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी हिंदूंनाच लक्ष्य केल्या जात आहे. त्यामुळे आता केवळ जागृती करत बसण्यापेक्षा त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. समर्थ रामदासस्वामींनी यांच्याप्रमाणे आज आपले संत जागृती करत असल्याने आपल्यालाही या सनातन राष्ट्र शंखनादाच्या माध्यमातून सनातन राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढण्यासाठी सिद्ध व्हावे लागेल.