मुंबई:-अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार, वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असून पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा १८ ऑगस्टला आढावा घेतला जाणार आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. साहजिकच महाविकास आघाडीचे भविष्यही काहीसे धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत स्वबळावर लढण्याची वेळ आलीच, तर त्याची तयारी आतापासूनच असायला हवी या विचाराने उद्धव ठाकरे यांनी त्यादृष्टीने लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
लोकसभानिहाय मतदार संघाच्या बैठकीला संबंधित ग्रामीण मतदारसंघातील संपर्क नेते, स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघटीका, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख तसेच शहरातील विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख या बैठकांना हजेरी लावतील.
Home राजकारण उद्धव ठाकरे यांच्याकडून ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी आढावा घेणे सुरू