Home स्टोरी आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर पुढील वाट फार कठीण असेल! मनोज जरांगे...

आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर पुढील वाट फार कठीण असेल! मनोज जरांगे पाटीलांचा सरकारला इशारा…

229

२८ ऑक्टोबर वार्ता: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर पुढील वाट फार कठीण असेल असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला आहे. तसेच गावबंदीबद्दल बोलताना, तुम्ही गावांमध्ये हिंडून काही होणार नाही. त्याऐवजी मुंबईमध्ये जमा आणि एका दिवसाच्या विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण देण्याचा ठराव मांडून मंजूर करत मराठ्यांना पाठबळ द्या, असं आवाहान मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे.

वयोमर्यादेचा अंदाज घेऊन आमरण उपोषण सुरु करा. उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सुरु करा. २९ पासून सुरु करा ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी सुरु करा. संपूर्ण गाव एकजुटीने एकत्र बसा. गावं एकजुटीने उपोषणाला बसल्याने सरकारवर दबाव तयार होतो का? सरकार आपल्याकडे गांभीर्याने बघतंय का हे समजेल. आपल्या गावात किंवा दारात कोणात्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचं नाही. आपणही कोणत्याही नेत्याच्या दारात जायचं नाही,” असं जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांना सांगितलं आहे. तसेच पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी, “उपोषण आंदोलनादरम्यान कोणाच्या जिवतीस धोका झाला तर सर्व जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची असेल,” असं जरांगे पाटील म्हणाले. “तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन १ तारखेपासून सुरु होईल. त्याची माहिती नंतर देईन. आरक्षण मिळणार त्याची काळजी करु नका. आत्महत्या करु नका,” असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलं.

राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावाच लागेल असं सांगताना मनोज जरांगे पाटील यांनी, “ज्यांनी पालकत्व स्वीकारलं त्यांना जनतेच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. आम्ही ६ वाजेपर्यंत वाट पाहणार. सरकार किती इमानदार आहे. जनतेशी किती प्रामाणिक आहे. सरकार दगाफटका करणार आहे का? की प्रश्नाचं उत्तर देऊन प्रामाणिकपणाने उत्तर देणार हे ६  वाजेपर्यंत कळेल,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.