Home स्टोरी ‘आम्ही बालकवी’ च्या संस्थापकांची पेंढऱ्याची वाडी प्रशालेस सस्नेह भेट…!

‘आम्ही बालकवी’ च्या संस्थापकांची पेंढऱ्याची वाडी प्रशालेस सस्नेह भेट…!

181

वेंगुर्ला प्रतिनिधी: ‘आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’ या संस्थेचे संस्थापक राजेंद्र गोसावी यांनी बालिका दिनाचे औचित्य साधून जि. प. पू. प्रा. शाळा पेंढऱ्याची वाडी, पेंडूर-वेंगुर्ले या शाळेस भेट दिली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री. गोसावी यांनी सावित्रीबाईंचे चरित्र सांगून त्यांच्या कार्याविषयी मुलांना माहिती दिली. मालवणी व मराठी शीघ्र कवी असलेल्या श्री. गोसावी सरांनी आपल्या कविता सादर करून मुलांकडूनही कविता करवून घेतल्या. यावेळी त्यांनी मुलांना चार मंत्र दिले.

ते म्हणाले, ”खूप वाचा. दररोज काही न काही लिहा. एकाग्र चित्ताने ऐका, आणि जीवन जगायला मदत करणारी एक तरी कला जोपासा.”

‘आम्ही बालकवी’ ही संस्था मुलांच्या हाताना काम देणे, त्यांचे सुप्त गुण ओळखणे, ते वाढीस लावणे आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मुले या संस्थेत सदस्य आहेत. गोसावी सरांना शाळा, लहान मुले खूप आवडतात. त्यामुळेच ते आपला व्यवसाय सांभाळत असताना विविध शाळांना भेटी देतात. मुलांचे मनोरंजन करतात. त्यांचे सुप्त गुण जाणून घेवून त्यांना प्रोत्साहन देतात. बुधवारी त्यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे विविध बक्षिसे, प्रमाणपत्रे देवून सन्मानित केले. दोन गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत केली. विद्यार्थ्यांना लिखाणास प्रेरीत केले.

साईशा फटनाईक आणि जिविका हरमलकर यांनी गोसावी सरांची उत्तम मुलाखत घेतली. तसेच साईशा फटनाईक, जिविका हरमलकर, केयांश हरमलकर, कृतीक गावडे, रोशनी कुंभार, दिशा जळवी,संदेश गावडे यांनी दशावतारी भूमिका सादर करून वाहवा मिळविली. विविध प्रकारची कोडी सोडविताना मुले मंत्रमुग्ध होऊन गेली होती.

एकूणच, हा कार्यक्रम मुलांसाठी विशेष अविस्मरणीय ठरला.