सावंतवाडी प्रतिनिधी: आंबोली घाट भ्रष्टाचार प्रकरणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कठोर भूमिका घेऊन संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आंबोली घाटातील काही विकास कामांना गती मिळाली. त्यासाठी आंबोली येथील ग्रामस्थांनी साळगावकर यांना आज प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानले. तसेच संरक्षण भिंती बांधून घेण्यासाठी प्रयत्न करा अशी त्यावेळी मागणी देखील केली. याहीसाठी आपण प्रयत्न करू अशी साळगावकर यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली. याप्रसंगी आंबोली येथील ग्रामस्थ केशव जाधव, किसन पवार, प्रीतम सावंत, शशिकांत जाधव, प्रकाश जाधव त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे नेते अण्णा केसरकर, माजी नगरसेवक विलास जाधव व बंड्या तोरस्कर उपस्थित होते.