मसूरे प्रतिनिधी: कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावची सुकन्या व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या कु. मिताली हर्षिता हरिश्चंद्र परब हिने सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेमध्ये यश मिळवले आहे . देशपातळीवरील अनेक कठीण परीक्षांपैकी ही एक कठीण परीक्षा असून या परीक्षेमध्ये यश संपादन करणे ही खूपच मोठी गोष्ट आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील असून या प्रकारची कोणतीही पार्श्वभूमी नसताना देखील अतिशय मेहनतीने व चिकाटीने तिने हे यश मिळवले आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही खूपच प्रेरणादायी गोष्ट आहे.
प्रत्येक शैक्षणिक स्तरावर यश मिळवत असताना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून तिने भरतनाट्यम विशारद ही पदवी सुद्धा प्राप्त केली आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना ती म्हणते, ” अभ्यासात सातत्य आणि प्रयत्न करत राहणं खूपच महत्त्वाचं आहे, हे करण्याची तुमची तयारी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे कठीण नाही.”
यावर्षी देशपातळीवर घेतलेल्या चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेचा १३. ४४% एवढ्या अल्प टक्केवारीत निकाल लागला असून संपूर्ण देशभरातून केवळ ११५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यामध्ये कु.मिताली हिचा समावेश आहे ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. आंदुर्ले गावचे विधीज्ञ श्री. आनंद रमाकांत परब यांची पुतणी आहे. तिच्या या यशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून आणि परब परिवार यांच्या मित्र परिवाराकडून तिचे भरभरून कौतुक होत आहे.