सिंधुदुर्ग प्रतिनिधी: उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद बहाल केले असते, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हल्ली माझं पुस्तक प्रकाशित झाले आहे. यामध्ये मी हीच भूमिका मांडली आहे. आता झालं ते झालं. यापुढे आम्ही, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस जोमाने काम करणारा आहाेत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातील सत्तासंघषार्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
“सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी आता अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितले आहे. आता याबाबत विधानसभा अध्यक्षांनी विशिष्ट काळात निर्णय देणे अपेक्षित आहे.सर्वोच्च न्यायालयाने तत्कालिन राज्यपालांविरोधात तीव्र भूमिका मांडली आहे. राज्यपालांची भूमिका चुकीची होती, असे न्यायालयाने म्हटलं आहे. जेव्हा तुम्ही घटनात्मक पदावर काम करता तेव्हा अशा प्रकारचे निर्णय घेणे चुकीचे ठरते. ज्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवता त्या पक्षाची भूमिका महत्त्वाची असते, असेही शरद पवार यांनी या वेळी सांगितले.