भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा तर शिवसेना शिंदे गटाला ४८ जागा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे. या विषयावर चर्चा सुरू झाल्यानंतर बावनकुळे यांचा तो व्हिडिओ देखील सोशल मिडियावरून हटवण्यात आला. याबाबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले बच्चू कडू बोलताना? चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे की, चुकून त्यांनी वक्तव्य केलं हे तपासलं पाहिजे. आम्ही शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. युतीचं अजून आमचं काही ठरलं नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची, नाही करायची, किती जागा देणार, नाही देणार त्याचं अजून काही ठरलेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये त्याबाबत निर्णय घेतला जाईल. पुढच्या दीड वर्षात काय होणार? हे आत्ताच काही सांगता येणार नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. तीन वेळा शपथविधी झालेत. त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार? हे आत्ताच सांगता येणार नाही. बच्चू कडू यांच्या या भाष्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.