आम्ही एकत्र आलो की, छापे सुरू होतात. २०१७ मध्येही असेच झाले होते. आता पाच वर्षांनंतर पुन्हा तेच सुरू झाले आहे, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र सरकारवर केली आहे. ईडी ने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. कविता यांचीही चौकशी केली आहे. ईडीच्या चौकशीवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.


बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांची सीबीआयने अलीकडेच दिल्लीत चौकशी केली. लालूप्रसाद यादव यांनी सांगितले की, आरएसएस आणि भाजप यांच्याविरुद्ध माझी वैचारिक लढाई सुरू आहे आणि सुरूच राहील. मी कधीही गुडघे टेकले नाहीत. माझा परिवार आणि पक्ष यातील कोणीही व्यक्ती तुमच्यापुढे झुकणार नाही.

तेजस्वी यादव यांना दि. ४ मार्च रोजीच सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते. पण चौकशी हजर न राहिल्यामुळे त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, तेजस्वी यादव यांनी वाढीव मुदत मागितली आहे. के. कविता यांची दिल्ली अबकारी धोरणातील कथित अनियमिततांशी संबंधित प्रकरणात शनिवारी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात ९ तास चौकशी झाली आहे. हैदराबादेतील व्यावसायिक अरुण रामचंद्रन पिल्लई यांच्यासमोर बसुन त्यांची चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना बोलावले होते. यामुळे आता विरोधाकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

साहेब, तुरुंगात टाकून तुम्ही मला त्रास देऊ शकता. पण तुम्ही माझे मनोधैर्य तोडू शकत नाही, असा संदेश दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तिहार तुरुंगातून पाठविला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, मोदी यांनी मागील १४ तासांपासून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी ईडी थांबवून ठेवली आहे. त्यांची गर्भवती पत्नी आणि बहिणींना सतावले जात आहे. लालूप्रसाद यादव ज्येष्ठ आहेत, आजारी आहेत. तरीही मोदी सरकार त्यांच्याबद्दल मानवता दाखवायला तयार नाही.